विठ्ठल विठ्ठल आळवी

विठ्ठल माझ्या ध्यानी मनी
सावळे रूप मनोहारी

किती गुण गायले तरी
देवा वीट नाही चित्ती

सुखे दु:खे नाम मुखी
विठ्ठल  विठ्ठल  आळवी

तुझ्याच  पायी स्थैर्य संसारी
कोण मागणे आणखी नाही

बा विठ्ठला अशीच कृपा ठेवी
मी भाबडा जीव तुझे गुण गाई !  

भाव डोळ्यात रिते झाले

भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले

का, केव्हा, कसे
मो शोधत राहिले

कवितेचे पान पुन्हा गहिवरले
सुन्न मनाला आळवू लागले

त्या दिशांचे तराणे
क्षितिजावरच विरले
शब्दांना  खूप वळविले
पण गीत खरे पापणीतून निखळले

शब्द तिथेच थिजले, लाजले
कारण भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले

जुन्या अगम्य वाटा

आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा
भावनांच्या पानावर
निशब्द कविता

हळव्या मायभूमीवर
आशांचा कोसळता मनोरा

अथांग सागरावर
भयाण लाटा

का दिसतात आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा?

मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण

अश्विन सरताना पावन भूमीवर उजळतो दिप 
तेजोमय दश-दिशा अन् प्रफुल्लित  मनं

मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण
प्रदिप्त समशेर अन् विक्राळ दैत्यांचे खंडण

अश्वमेध तो स्वराज्याचा अजिंक्य
इतिहासाचे सोनेरी पान वीररसाने तप्त

अंगणी सजतो लघु दुर्ग तो मनमोहक
तट, बुरुज स्मरतो प्रौढ प्रताप पुरंदर

कृपाच अशी आमुच्या दिव्य राजाची अपार
आनंदाचे हे अथांग ऋण वदतो आम्ही पामर

अभिमानी आम्ही या  थोर राज्याचे बालक
त्या तेजोदिप्त निष्णात  तलवारीचे ऋणी अन् शिवबाचे साधक



स्वप्नांविषयी थोड़ेसे

स्वप्न जेव्हा सत्यात येते
मन तेव्हा प्रश्न करते
मग सुख नेमके
कशात होते ?
--------------------------------------
प्रत्याक्षाहुन प्रतिमा
नेहमीच उत्कट
सत्य नाही
स्वप्नंच मिळतात फुकट!
--------------------------------------
एका  दीन-दुबळ्या  देशी
सारेच आहेत सुखी
कारण काय बरं ते?
साऱ्यांकडे स्वप्नांची उशी
--------------------------------------
स्वप्नं विकून ते गरिबांना
सत्यात पैसे कमावतात
नकळत फसून गरीबच श्रीमंतांना
अधिक श्रीमंत करतात
--------------------------------------
स्वप्नं दाखवूनच ते राज्य करतात
सामन्यांना लूट लूटतात
आणि तीच अपूर्ण स्वप्नं घेऊन
पुन्हा सत्तेत येतात
--------------------------------------
रंगीबेरंगी स्वप्नांचा पूर
मृगजळच ते! खूप दूर
वेडया आशांचे आरसे
लखलखतात अजून
--------------------------------------

शब्द तेव्हा धावत येतात

मावळतीच्या गडद छटा
जेव्हा उदास वाटतात
पानांची सळसळ
संथ तराणे होते
क्षितिजावरच्या रेषा
जेव्हा धुसर होतात
शब्द तेव्हा धावत येतात...
आणि अनोखे भाव उलडगतात

माझी झाली चारोळी

अतिशय  कमी शब्दांतून  मार्मिक अर्थ व्यक्त करणारी चारोळी मला नेहमीच भुरळ  घालत आली आहे...ती लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

१) माझ्या देशात लोक स्वप्नं जाळतात
त्यावर दु:खाची पोळी भाजतात
आणि पोट भरलं म्हणून
सुखाने झोपतात

२) अवती भवती हिरवळ
पानांची सुमधुर सळसळ
सूर्याचा पहिला किरण
हे स्वप्नच का केवळ ?

३) कित्येक स्वप्नांचा चुरा
इथे रोज होतो
तरीही नव्या आशांचा मनोरा
आम्ही रोज रचतो

४) चार चार ओळी लिहीताना
माझी झाली चारोळी
व्यक्त काही झाले की नाही
मी तोडली चाकोरी 

तू दूर कुठे ?

नील आभाळ आणि
लुकलुकते  तारे
मला साद  घालती सारे
तू  दूर  कुठे ?

स्वप्नातले गीत  आणि
सुखाचे फसवे मनोरे
त्या लाटा  अन्  ते किनारे
तू  दूर  कुठे ?

वाट पाहून  शिणले   डोळे
तू  दूर  कुठे ?

अबोली मिटताना

संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले
पहाटे दवबिंदु पाहताना
साद घालू लागले
पाना-पानांत फूल हसले
केशरी किरणात न्हाऊन निघाले
संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले...

भूमीपुत्राची व्यथा

काळ्या ढगाची कृपा कधी होणार?
कोरडया डोळ्यातली आस
देवा तुला कधी कळणार?

पेटत्या निखाऱ्यावर चालणारी  ती पावलं
रडवेली पोरं
अन्  राब-राबून थकलेल्या हातांची वेदना
देवा तुला कधी कळणार?

भूमीपुत्राची ही दशा 
धगधगत्या वास्तवात जळणारी त्याची आशा
या शेतात पालवी कधी फुटणार
रानात केलेलं  रक्ताचं  पाणी
देवा तुला कधी दिसणार?

भुकेचा वणवा तर अन्नदात्याच्याच पोटात
काय देवा तुझा  न्याय काही जात्यात तर काही सुपात!

तळमळ

ते  अस्थिर किनारे 
उमलून पडलेले शिंपले
आणि तरफ सूने सूने
 
चंचल लाटा
अधीर समुद्रपक्षी
आणि ओथंबलेलं  आभाळ

हळव्या मनाचे मौन
आणि आनंदाचे मृगजळ

तू नसताना होते ती हीच का
मनाची तळमळ?

विसरलेली गाणी

आभाळी तारे  असताना
तू जवळ नसताना
मन पिसे होताना
आणि आठवणीत  रमताना
विसरलेली गाणी
अशी साद घालतात......
परत त्या चंदेरी दुनियेत नेतात
भावस्वप्ने उलगडतात आणि
पाकळ्या होऊन विसकटतात....

शिवतेज

शब्दातीत  युगपुरुष तू
शौर्य, सुमेधा अन् मांगल्याचा सूर्य
या पावन भूमीचा राजा की  आत्म्याचा ईश्वर

समरांगणी  पेटल्या सहस्त्र वीर तलवारी
हर एक सूर्यशक्तीसम तुझ्या प्रज्ञेने तेजाळलेली

वैराण भूमीवर अनमोल सृष्टी चे व्रत
अखिल जगी तुझे उदात्त राज्य
साक्ष आहे शुक्ल पक्षीचा चन्द्र

आजही गहीवरे प्रत्येक माता
कधी लाभेल  मुक्तीचे पुण्य 
अन् पुत्र तुजसम त्राता

निश्चल मृतप्राय आज पुन:श्च ही भूमी
अर्जुन रक्तास हवी तुझ्या प्रेरणेची नवसंजीवनी

- अनुजा खैरे

होळीच्या शुभेच्छा!!

उजळलेले  क्षण
रंगांनी  मोहरुन जावे,
सुखाची उधळण व्हावी
आणि मन त्यात हरखुन जावे.....

खूप काही सांगायचे राहुन गेले

तुझ्या डोळ्यातले अश्रु
माझे झाले
खूप काही सांगायचे राहुन गेले

गहिवरलेले शब्द तिथेच थिजले
व्यक्त करायचे राहुन गेले

तुला पाहताना
फक्त अश्रुच बोलले
मन मोकळ करायचे राहुनच गेले

तुझ्या शब्दांनी भरुन आलेले
कळतील का कधी तुला
माझे अव्यक्त भाव
जे तुला सांगायचे राहुन गेले

पुन्हा तारे तुटताना...!

पुन्हा तारे तुटताना
मी बालिशपणे खुप काही मागितले
काही स्वप्नं आणि खरे खुरे यत्न...
सारे डोळ्यांसमोर तरळले
तो ताराही तसाच क्रूर निघाला तर .....?

भाबडे मन ससा झाले
कावरु बावरु पिसे झाले

पुन्हा  तारे तुटताना
नको तो बालिशपणा
पुन्हा तेच मागणे
तिच निराशा
आणि पुन्हा तोच प्रश्न

तो ताराही तसाच क्रूर निघाला तर ....?

मी कोरले काही क्षण...!

मी कोरले काही क्षण....

थोडे तुझे, थोडे माझे
थोडे उत्कट, थोडे विकल
काही बावरे, काही विफल
काही आतुर, काही अव्यक्त
काही वेडे, काही विरक्त


मी कोरले काही क्षण
आठवणींच्या पाषाणावर...

खुप ठरवलं

खुप ठरवलं   
स्वत:च्या वाटा  तयार करायचं
प्रवाहा विरुद्ध पोहायच
आणि क्षितीजापलीकडे पाहायचं...

आडवणाऱ्या भिंतींना तोडायचं 
खाचा खळग्यान्ना  फुलं  मानायचं 
उदात्त  धेय्यांना कवटाळlयच
आणि जगणं  सोहळl  करायचं 

जस जसं आयुष्य सुरु झालं,   
एक एक स्वप्न तुटू लागल
वास्तव समोर येऊ लागल
आणखीनच हतबल करु लागलं

पुढयात  येणारी फुलंही काटे होती
यशाला मिंधेपण होतं
आणि समृद्धिला काळी किनार होती

खुप ठरवल...
स्वप्न पुन्हा शोधायचं
पुन्हा नव्याने  जगायच
प्रवाहा विरुद्ध पोहायचं
आणि क्षितीजा पलीकडे पाहायचं

पुन्हा त्याच वाटा
तेच काटेरी यश आणि तोच हतबलपणा...

पण पुन्हा ठरवलं
खुप ठरवायचं
स्वप्न पाहात  राहायचं
सत्य चितारायचं....

अश्रुंचीही एक भाषा असते

गोठलेले अश्रु आज वितळले
सुन्न किनारी फिरताना मला बिलगले
खूप काही सांगू लागले,
म्हणाले,
अश्रुंचीही  एक भाषा  असते
त्या पैलतीरी जाताना ती ऐकू येते
असे किनारे ओलांडताना  .....
नवी क्षितिजे पाहताना ...
झुरताना...
कष्टताना....
सुदूर धेय्याची स्वप्ने पाहताना ....
ती खूप काही शिकवून जाते
अश्रुंचीही  एक भाषा  असते....

चार क्षण ऊन

चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन

भरजरी शालीचे
सोनेरी धागे उसवून
मी विणले हे  सक्त धागे कसे कोणास ठाऊक

थंडगार वाऱ्याची झुळ्ळूक आली
पावसाचा शिडकावा घेऊन
मी मात्र पाहीला   
घोंघावणारा वारा आणि लख्खं  ऊन

पाखरांची साद आली
मंजूळ क्षणी गात
मी मात्र ऐकले शांत तटस्थ आगाज...

अशाही रुक्ष वनात तू शोधलेस
दवबिंदू नवलाइचे
तुझ्या पोरकट स्वप्नाने केले
सारे सोहळ्याचे....

चार क्षण पाऊस
चार क्षण  ऊन
दे ना तुझे स्वप्न
देईन माझ्या उशाशी ठेवून...

विरह

धूसर  होणाऱ्या पायवाटा
आणि घननीळ समुद्राचा  आगाज
त्या नीरव  शांततेत
तुझ्या आठवाने कंपित होणारे  हृदय.....
त्या घननादाच्या दिशेने माझे अकल्पित जाणे
तुझ्या-मुळच विदीर्ण झालेल्या मनाचे
पुन्हा तुझ्याच ओढीने
अधीर होणे ....
हे मात्रुभूमी,
तुझा जिव्हारी लागत जाणारा
विरह सहन होत नाही....

कागदाचं एक पान