दडपून टाकलेले काही आवाज

दडपून टाकलेले काही आवाज
आज  मनात आवाज उठवत होते

आत काहीतरी तुटत होतं 
साद घालून थकत होतं ...

इतके दिवस दाबून ठेवलेल्या वेदना
भटकं मन विसकटत होतं ...

एरवी ओरड़त राहणारं  मन
आज मौनाची भाषा  करत होतं

आठवणींचे   धागे-दोरे जमवून
मखमली  स्वप्नांच्या  शाली विणत होतं

तुटलेल्या धाग्यान्ना  कवटाळत होतं
आणखीनच कातर होत होतं   

मी त्याला  उगी उगी केलं
पण आज सगळचं  न्यारं  होतं .....

कारण,

दडपून टाकलेले काही आवाज.......
आज  मनात आवाज उठवत होते...........

पुन्हा त्याच शाश्वत जगात जगण्यासाठी ...

"देवाचा दूत ना तू?" मी त्याला रागानेच विचारले
त्याच्या डोळ्यातून होकार कळताच
आणखी रागे भरले
"तुला दिसत नाहीत ही दु: खं?
या व्यथा, वेदना,
का जगाला चिरडून  टाकतोयस ?
सांग ना सुख कुठे लपवलयस ते ....
दे इकडे ती तुझी जादुची कुपी
तुझ्यात हिंम्मत नसेल तर
मी शिंपडेन त्यातला जादुचा थेंब
जो करेल सार्यांची  व्यथा दूर
करेल सारं निर्मल, निरलस ...
नाही रे पहावत या जगाकडे
कसलं हे  तर्कशास्त्र तुझं ,
जगाला चालू  ठेवण्याचं?"
त्याच्या डोळ्यात मला विलक्षण विरक्ति दिसली.
तो म्हणाला "जाणून घ्यायचयं?"
मी अधीरतेने म्हणाले "हो"
आणि पुढच्याच क्षणी ...
माझे डोळे उघडले ...
पुन्हा त्याच अस्वस्थतेत, अधीरतेत आणि क्रूर कुतुहलात जगण्यासाठी....
पुन्हा त्याच शाश्वत जगात जगण्यासाठी...

तुझी साद

तुझ्या विरक्त आठवणीत मी स्वत:ला शोधत
राहते
का कुणास ठाऊक
तुझ्या अनिमीष नेत्रांकडे पाहत राहते
तुझं मौन काही  केल्या संपत नाही
आणि मला साद घालायला विसरत नाही
काय  रे ? मन मन म्हणतात ते तुच का?
मग असं वैर का धरलयसं  माझ्याशी?
खूप ओरडावसं  वाटतं  तुझ्यावर
पण तुझं मौन काही केल्या संपत नाही
आणि मला साद घालायला विसरत नाही.

ओसाड रानाची हिरवी कथा

क्षितीजापल्याड दिसेनासा होणारा समुद्रपक्षी
रेतीत रुतत जाणारे पाय
आणि  कोरडया वाऱ्याबरोबर भरकटणारे मन
त्याच ओसाड रानात जाताना
विरत जाणारा नामशेष उत्साह ...
मनाची कवाडे कलती ठेवून
त्याची होणारी तगमग पाहताना
येणारी  व्याकूळता ...
इवले दवबिंदु हे चित्र पालटतात
नवी पहाट घेऊन येतात
नवी गाणी गातात
त्या इवल्या पाखरांसवे...
आता क्षितीजापल्याड
उगवतीची किरणं दिसतात
कोरडया वाऱ्याबरोबर भरकटणा रे मन 
आनंदाने सळसळते आणि त्याच
ओसाड रानात जाताना
नवीन उत्साहाची पेरणी करते
त्या रानाला हिरवगार बनवण्यासाठी!

हरवलेलं पोपटी जग

आटलं  का सगळ  पाणी ?
कुठे गेले ते निर्झर ओढे?
कुठे गेल्या त्या नदया
निसर्गाने  कोरलेले निर्मल आविष्कार
आणि प्रत्येक दिवस सोहळ्याचा करणारे ते पक्षी  कुठे गेले
मनं हिरवी करणारी रानं आणि टेकडया
ईश्वराने उधळलेले ते उमललेले अनमोल मोती
कुठे गेले ?
निष्पाप वन्यजीव आणि भाबडे गावकरी कुठे गेले ?
कि हे आख्ख़ पोपटी जगच हरवलय?
दडुन  बसलयं कालाच्या छायेत?
कि ते दडपुन टाकण्याचं कारस्थान केलय
तुम्ही आणि मी?

"नाति"

मनाच्या कोपऱ्यात दुभंगलेली नाति राहतात
तूटता तूटत नाहीत
विसरता विसरत नाहीत
सतत जाणीव करुन देतात
आयुष्यतल्या उणीवेची !
इतके दिवस अबोल भासणारी
दुराव्याचा सल बोचवणारी
ती नाति एकदा बोलू लागली ,
म्हणाली आम्ही दुभंगलोय
आम्हाला सांधता येईल का ?
डोळ्यातून गळणारी आसवं
म्हणाली
हो ss  पाहा आमची काही मदत होते का...
नाती आनंदली
आसवांसवे बागडली
मनाच्या रूक्ष वाळवंटात
पावसासारखी बरसली....
त्यांना वाटलं   नव्हतं इतक्या
नकळत पणे सांधली गेली ....
आता मनाच्या कोपऱ्यात अतूट नाति राहतात
तूटता तूटत नाहीत
विसरता विसरत नाहीत
सतत जाणीव करून देतात
आयुष्यतल्या आनंदाची!

नामशेष शिवतेज

संथ,  तटस्थ, म्लान भयाण आभाळास भेदून
भेसुर वाटणाऱ्या भीषण जगात
सूर्याचे तेज अवतरले
निसटून जाणारी  अस्तित्व गोळा  करणारी
माणसे आणि निष्ठूर हास्यावर गरजले,
स्वत्व विसरलेल्या निर्जीव माणसात
त्याने प्राण फुंकले
अशक्य-प्राय वाटणारे असे सगळे
त्याने केले, या पृथ्वीतलास वाचवण्यासाठी!
हे राज्य व्हावे
या एकाच  उदात्त धेय्याने अख्खे आयुष्य
 थंडी, वारा, तहान भूक विसरुन स्वराज्यसाठी झिजवले ,
त्यामुळे आमचे अस्तित्व आज गवसले,
त्या शिवतेजाने पेटविलेली ठीणगी आजही
असंख्य ह्रुदयांत जळते आहे .....
पण त्याचे उदात्त स्वराज्य मात्र नामशेष होताना
पाहते आहे .....

कोवळ्या किरणा पल्याड

मोठे शब्द, पल्लेदार वाक्यं
भावनांना आलेला ऊत
प्रत्येकाचे तेच दु : ख आणि तीच रडारड
तीच धडपड, तीच पळापळ आणि तीच आगपाखड
कोणी मला ती कोवळी  किरणे जी उगीचचं नवी स्वप्ने, आशा,
आणि  जीवन घेऊन येतायेत त्यांच्या देशात घेऊन जाईल का?
बघुया तरी काय जादू घडते तिथे ......
ओघळणारे अश्रू,
निसटणारी धेय्यं,
आणि निष्फळ प्रयत्नांच्या पल्याडचे जग
असते तरी कसे?
नक्कीच हवे-हवेसे, ताजे आणि चिरतरुण असेल ...
मला जायचयं  तिकडे, एकटच नाही राहायचयं तिथे
अगदी तसचं जग निर्माण करायचयं  ईथे ...
 कदाचित माझ्यासारखं  कुणी
शोधत येईल मग
कोवळ्या किरणा-पल्याडचे जग पाहायला ईथे  ...
मग मी देईन माझ्याकडची  अनमोल
शिदोरी ज्यात असतील उदात्त स्वप्ने, सफल आशा आणि देवदुतासारखी
भासणारी मनुष्य मात्रे  ...

अस्तित्वाचे अस्तित्व

अस्पष्ट दवबिंदू, ढगांनी लपवलेले निळ आकाश
आणि पाना-आडचे  इवले  फूल
निर्ढावलेल्या जगात किती कोमेजून गेलेत .....
शोधतायेत स्वत: चे अस्तित्व, स्वत: च जग....
एखाद्या प्रसन्न क्षणी गारवा  येतो
थंडगार झुळ्ळूक  आणतो 
दवबिंदू गोठतात उठुन दिसतात .
ढग पळतात   आकाश  निरभ्र होते
पानं   सळसळतात फूल  स्पष्ट दिसते ....
सगळ  जगच कसे सुंदर  भासते
कारण त्यांचे झाकोळलेले असतित्व अधोरेखित होते.....

स्वप्न फुलांच्या समिधा

असंख्य विचारांनी डोक्यात नुसते थैमान घातले होते, मग वाटल, आता लिहिलेच पाहिजे आणि  ही कविता लिहिली.

स्वप्न फुलांच्या समिधा

आयुष्याच्या वाटेवर निरंतर चालताना
दिसतात फक्त खाच-खळगे
स्वप्नाफुलांच्या वाटेवर स्वच्छन्दपणे
बागड़णारे बिचारे मनभुंगे
विनातक्रार आयुष्य रेटणारे सोबती
पाहिले की
वाटते स्वत: चेच आश्चर्य
दिसतात स्वत: च्या बंडखोरीच्या
अस्पष्ट पाऊलखुणा
अस्तित्व शोधण्याचा केलेला असफल प्रयत्न
आणि प्रत्येक प्रयत्नान्ति मिळणारा निर्घ्रुण भ्रमनिरास
शांतिच्या आशेने  भटकणारे मन
आणि सूदूर धेय्याला
गाठण्यास आसुसलेले खोल डोळे ............
याच डोळ्यात कधी अंगार फुलतात
कधी फुले उमलतात कधी निष्पाप बाळासारखे 
हट्ट उमटतात
भकास जगातली सततची घुसमट
टाळा यला आतूर होउन पाणावतात.........
आशावादीच रहायचे हा अट्टहास
करून पावले निघतात पुन्हा त्याच  आयुष्याच्या वाटेवर 
निरंतर .......... चा ल  ण्या स ........

- अनुजा

कागदाचं एक पान