चार क्षण ऊन

चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन

भरजरी शालीचे
सोनेरी धागे उसवून
मी विणले हे  सक्त धागे कसे कोणास ठाऊक

थंडगार वाऱ्याची झुळ्ळूक आली
पावसाचा शिडकावा घेऊन
मी मात्र पाहीला   
घोंघावणारा वारा आणि लख्खं  ऊन

पाखरांची साद आली
मंजूळ क्षणी गात
मी मात्र ऐकले शांत तटस्थ आगाज...

अशाही रुक्ष वनात तू शोधलेस
दवबिंदू नवलाइचे
तुझ्या पोरकट स्वप्नाने केले
सारे सोहळ्याचे....

चार क्षण पाऊस
चार क्षण  ऊन
दे ना तुझे स्वप्न
देईन माझ्या उशाशी ठेवून...

विरह

धूसर  होणाऱ्या पायवाटा
आणि घननीळ समुद्राचा  आगाज
त्या नीरव  शांततेत
तुझ्या आठवाने कंपित होणारे  हृदय.....
त्या घननादाच्या दिशेने माझे अकल्पित जाणे
तुझ्या-मुळच विदीर्ण झालेल्या मनाचे
पुन्हा तुझ्याच ओढीने
अधीर होणे ....
हे मात्रुभूमी,
तुझा जिव्हारी लागत जाणारा
विरह सहन होत नाही....

दडपून टाकलेले काही आवाज

दडपून टाकलेले काही आवाज
आज  मनात आवाज उठवत होते

आत काहीतरी तुटत होतं 
साद घालून थकत होतं ...

इतके दिवस दाबून ठेवलेल्या वेदना
भटकं मन विसकटत होतं ...

एरवी ओरड़त राहणारं  मन
आज मौनाची भाषा  करत होतं

आठवणींचे   धागे-दोरे जमवून
मखमली  स्वप्नांच्या  शाली विणत होतं

तुटलेल्या धाग्यान्ना  कवटाळत होतं
आणखीनच कातर होत होतं   

मी त्याला  उगी उगी केलं
पण आज सगळचं  न्यारं  होतं .....

कारण,

दडपून टाकलेले काही आवाज.......
आज  मनात आवाज उठवत होते...........

पुन्हा त्याच शाश्वत जगात जगण्यासाठी ...

"देवाचा दूत ना तू?" मी त्याला रागानेच विचारले
त्याच्या डोळ्यातून होकार कळताच
आणखी रागे भरले
"तुला दिसत नाहीत ही दु: खं?
या व्यथा, वेदना,
का जगाला चिरडून  टाकतोयस ?
सांग ना सुख कुठे लपवलयस ते ....
दे इकडे ती तुझी जादुची कुपी
तुझ्यात हिंम्मत नसेल तर
मी शिंपडेन त्यातला जादुचा थेंब
जो करेल सार्यांची  व्यथा दूर
करेल सारं निर्मल, निरलस ...
नाही रे पहावत या जगाकडे
कसलं हे  तर्कशास्त्र तुझं ,
जगाला चालू  ठेवण्याचं?"
त्याच्या डोळ्यात मला विलक्षण विरक्ति दिसली.
तो म्हणाला "जाणून घ्यायचयं?"
मी अधीरतेने म्हणाले "हो"
आणि पुढच्याच क्षणी ...
माझे डोळे उघडले ...
पुन्हा त्याच अस्वस्थतेत, अधीरतेत आणि क्रूर कुतुहलात जगण्यासाठी....
पुन्हा त्याच शाश्वत जगात जगण्यासाठी...

तुझी साद

तुझ्या विरक्त आठवणीत मी स्वत:ला शोधत
राहते
का कुणास ठाऊक
तुझ्या अनिमीष नेत्रांकडे पाहत राहते
तुझं मौन काही  केल्या संपत नाही
आणि मला साद घालायला विसरत नाही
काय  रे ? मन मन म्हणतात ते तुच का?
मग असं वैर का धरलयसं  माझ्याशी?
खूप ओरडावसं  वाटतं  तुझ्यावर
पण तुझं मौन काही केल्या संपत नाही
आणि मला साद घालायला विसरत नाही.

ओसाड रानाची हिरवी कथा

क्षितीजापल्याड दिसेनासा होणारा समुद्रपक्षी
रेतीत रुतत जाणारे पाय
आणि  कोरडया वाऱ्याबरोबर भरकटणारे मन
त्याच ओसाड रानात जाताना
विरत जाणारा नामशेष उत्साह ...
मनाची कवाडे कलती ठेवून
त्याची होणारी तगमग पाहताना
येणारी  व्याकूळता ...
इवले दवबिंदु हे चित्र पालटतात
नवी पहाट घेऊन येतात
नवी गाणी गातात
त्या इवल्या पाखरांसवे...
आता क्षितीजापल्याड
उगवतीची किरणं दिसतात
कोरडया वाऱ्याबरोबर भरकटणा रे मन 
आनंदाने सळसळते आणि त्याच
ओसाड रानात जाताना
नवीन उत्साहाची पेरणी करते
त्या रानाला हिरवगार बनवण्यासाठी!

हरवलेलं पोपटी जग

आटलं  का सगळ  पाणी ?
कुठे गेले ते निर्झर ओढे?
कुठे गेल्या त्या नदया
निसर्गाने  कोरलेले निर्मल आविष्कार
आणि प्रत्येक दिवस सोहळ्याचा करणारे ते पक्षी  कुठे गेले
मनं हिरवी करणारी रानं आणि टेकडया
ईश्वराने उधळलेले ते उमललेले अनमोल मोती
कुठे गेले ?
निष्पाप वन्यजीव आणि भाबडे गावकरी कुठे गेले ?
कि हे आख्ख़ पोपटी जगच हरवलय?
दडुन  बसलयं कालाच्या छायेत?
कि ते दडपुन टाकण्याचं कारस्थान केलय
तुम्ही आणि मी?

कागदाचं एक पान