स्वप्नांविषयी थोड़ेसे

स्वप्न जेव्हा सत्यात येते
मन तेव्हा प्रश्न करते
मग सुख नेमके
कशात होते ?
--------------------------------------
प्रत्याक्षाहुन प्रतिमा
नेहमीच उत्कट
सत्य नाही
स्वप्नंच मिळतात फुकट!
--------------------------------------
एका  दीन-दुबळ्या  देशी
सारेच आहेत सुखी
कारण काय बरं ते?
साऱ्यांकडे स्वप्नांची उशी
--------------------------------------
स्वप्नं विकून ते गरिबांना
सत्यात पैसे कमावतात
नकळत फसून गरीबच श्रीमंतांना
अधिक श्रीमंत करतात
--------------------------------------
स्वप्नं दाखवूनच ते राज्य करतात
सामन्यांना लूट लूटतात
आणि तीच अपूर्ण स्वप्नं घेऊन
पुन्हा सत्तेत येतात
--------------------------------------
रंगीबेरंगी स्वप्नांचा पूर
मृगजळच ते! खूप दूर
वेडया आशांचे आरसे
लखलखतात अजून
--------------------------------------

शब्द तेव्हा धावत येतात

मावळतीच्या गडद छटा
जेव्हा उदास वाटतात
पानांची सळसळ
संथ तराणे होते
क्षितिजावरच्या रेषा
जेव्हा धुसर होतात
शब्द तेव्हा धावत येतात...
आणि अनोखे भाव उलडगतात

माझी झाली चारोळी

अतिशय  कमी शब्दांतून  मार्मिक अर्थ व्यक्त करणारी चारोळी मला नेहमीच भुरळ  घालत आली आहे...ती लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

१) माझ्या देशात लोक स्वप्नं जाळतात
त्यावर दु:खाची पोळी भाजतात
आणि पोट भरलं म्हणून
सुखाने झोपतात

२) अवती भवती हिरवळ
पानांची सुमधुर सळसळ
सूर्याचा पहिला किरण
हे स्वप्नच का केवळ ?

३) कित्येक स्वप्नांचा चुरा
इथे रोज होतो
तरीही नव्या आशांचा मनोरा
आम्ही रोज रचतो

४) चार चार ओळी लिहीताना
माझी झाली चारोळी
व्यक्त काही झाले की नाही
मी तोडली चाकोरी 

तू दूर कुठे ?

नील आभाळ आणि
लुकलुकते  तारे
मला साद  घालती सारे
तू  दूर  कुठे ?

स्वप्नातले गीत  आणि
सुखाचे फसवे मनोरे
त्या लाटा  अन्  ते किनारे
तू  दूर  कुठे ?

वाट पाहून  शिणले   डोळे
तू  दूर  कुठे ?

अबोली मिटताना

संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले
पहाटे दवबिंदु पाहताना
साद घालू लागले
पाना-पानांत फूल हसले
केशरी किरणात न्हाऊन निघाले
संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले...

भूमीपुत्राची व्यथा

काळ्या ढगाची कृपा कधी होणार?
कोरडया डोळ्यातली आस
देवा तुला कधी कळणार?

पेटत्या निखाऱ्यावर चालणारी  ती पावलं
रडवेली पोरं
अन्  राब-राबून थकलेल्या हातांची वेदना
देवा तुला कधी कळणार?

भूमीपुत्राची ही दशा 
धगधगत्या वास्तवात जळणारी त्याची आशा
या शेतात पालवी कधी फुटणार
रानात केलेलं  रक्ताचं  पाणी
देवा तुला कधी दिसणार?

भुकेचा वणवा तर अन्नदात्याच्याच पोटात
काय देवा तुझा  न्याय काही जात्यात तर काही सुपात!

तळमळ

ते  अस्थिर किनारे 
उमलून पडलेले शिंपले
आणि तरफ सूने सूने
 
चंचल लाटा
अधीर समुद्रपक्षी
आणि ओथंबलेलं  आभाळ

हळव्या मनाचे मौन
आणि आनंदाचे मृगजळ

तू नसताना होते ती हीच का
मनाची तळमळ?

कागदाचं एक पान